जिल्हा नियोजन बैठकीत उपमहापौर मनोज चौधरींनी नागरीकांच्या मांडल्या समस्या

जळगाव, दि. १८ (जनसंवाद live): जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतीच जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीत उपमहापौर मनोज चौधरी यांनी जळगाव शहरातील विविध प्रलंबित प्रश्न व नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या. विशेषतः नवीन वाढीव भागांमधील पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर व अमृत योजना २.० तसेच मलनिस्सारण (भुयारी गटारी) योजनेच्या काम संथगतीने सुरू असल्याने विकासकामात अडचणी येत असल्याचे गंभीर प्रश्न मांडले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवानात बैठकीत उपमहापौरांनी खेडी व आव्हाने शिवार या नवीन वाढीव भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या असल्याचे निदर्शनास आणून दिले. या भागातील नागरिकांना दररोज पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून, मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर या भागांत नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यांबाबत त्वरित निर्णय घेण्याची विनंती उपमहापौरांनी पालकमंत्र्यांकडे केली.
भूमिगत गटारीच्या कामांवर नाराजी
यासोबतव अमृत २.० योजना व मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामांवरही उपमहापौरांनी नाराजी व्यक्त केली. वर्क ऑर्डर चार महिन्यांपूर्वी देऊनसुद्धा प्रत्यक्षात काम अपेक्षित गतीने सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले, जळगाव शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या योजनांमध्ये होणारा विलंब नागरिकांच्या अडचणी वाढवणारा ठरत असल्याचे सांगण्यात आले.
पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमहापौरांनी मांडलेल्या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यात अमृत योजनेच्या भुमीगत गटारींच्या कामामध्ये गती आणण्याचे, दर्जा सुधारण्याचे व नागरीकांच्या मुलभूत गरजा प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.





