जळगावात बौद्ध समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान

जळगाव, दि. ३०(जनसंवाद live): दक्षा फाउंडेशन आणि बौद्ध वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील बौद्ध समाजासाठी भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोरगरीब आणि गरजू कुटुंबांतील वधू-वरांना आधार देण्यासाठी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम पूर्णपणे मोफत राबवला जाणार आहे. वधु-वर परिचय मेळावा २० एप्रिल आणि सामुहिक विवाह सोहोळा मे महिन्याच्या शेवटी घेण्याचे आयोजकांनी कळवले आहे.
शासकीय योजनांचा लाभ आणि भेटवस्तू या सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या वधू-वरांना महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत ३० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय, नवीन संसारासाठी आवश्यक असलेल्या गृह उपयोगी वस्तू देखील दक्षा फाउंडेशनतर्फे मोफत स्वरूपात भेट दिल्या जाणार आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे विवाह सोहळ्याचा खर्च करू न शकणाऱ्या कुटुंबांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
नोंदणीसाठी आवाहन
दक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष उत्तमराव सपकाळे यांनी आवाहन केले आहे की, इच्छुक वधू-वरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आपली नाव नोंदणी व आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावीत. नोंदणीची अंतिम मुदत १४ एप्रिल २०२६ पर्यंत असून, नोंदणीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
नोंदणी पत्ता: दुकान नं. २१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जिल्हा पेठ, जळगाव.
प्रमुख आयोजक व संकल्पना
या सोहळ्याचे आयोजन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष आशिष सपकाळे आणि सामाजिक कार्यकर्ते व वधू-वर सूचक केंद्राचे संस्थापक श्री. युवराज वाघ यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. “समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना सन्मानाने विवाह सोहळा संपन्न करता यावा, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे,” असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील वधू-वरांनी या भव्य-दिव्य सोहळ्यात सहभागी होऊन शासनाच्या व सामाजिक संस्थेच्या मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



