अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश

जळगाव, दि. १८ (जनसंवाद live): अनुभूती बालनिकेतन मॉन्टेसरी व अनुभूती विद्या निकेतन येथे दि. १३ ते १८ जुलै दरम्यान “अनुभूती ट्री फेस्टिव्हल” साजरा करण्यात आला. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सीड बॉल (बीजगोळे) तयार करत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. माती, सेंद्रिय खत आणि स्थानिक वृक्षांच्या बियांचा वापर करून तयार होणारे सीड बॉल विद्यार्थ्यांसाठी केवळ एक उपक्रम नव्हते, तर निसर्गाशी नवे नाते जोडणारा अनुभव ठरला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता, हातात माती आणि मनात हिरवे भविष्य घडविण्याचे स्वप्न दिसत होते.

जैन इरिगेशन चे सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अनुभूती स्कुलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, अंबिका जैन यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या संकल्पनेला प्राचार्य मनोज परमार यांच्यासह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कृतीची जोड दिल्याने विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम संस्मरणीय ठरला.
जैन इरिगेशनचे गार्डन विभागाचे अजय काळे, गिरीष जगताप, पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, मयूर देशमूख तसेच सर्व ताई-दादांनी विद्यार्थ्यांना सीड बॉल तयार करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. विद्यार्थ्यांना देशी वृक्षांच्या बिया, माती आणि नैसर्गिक खताचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने सीड बॉल तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सीड बॉल तयार केले. हे सीड बॉल पावसाळ्यात विविध ठिकाणी टाकून, त्याद्वारे हरित क्षेत्र वाढविणे, नैसर्गिक वनस्पतींचे पुनरुज्जीवन आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
समारोप कार्यक्रमात संचालिका अंबिका जैन यांनी विद्यार्थ्यांना सीड बॉलचे वितरण केले. यावेळी अंबिका जैन बोलताना म्हणाले की, ‘हॅण्ड, हार्ड आणि हेड याद्वारे निर्माण झालेली सीड बॉल हे निसर्गाशी जुळणारी कृती आहे. कारण त्यांनी स्वत: ते केले आहे. वनसंवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण आणि निसर्गाप्रती संवेदनशीलतेचा यातून संदेश जातो. विद्यार्थ्यांना ‘ग्रीन अम्बेसेडर’ बनून अधिकाधिक झाडे लावण्याचे, त्यांचे संगोपन करण्याचे आणि पर्यावरण संरक्षणाला आपल्या जीवनाचा भाग बनविले पाहिजे.
खेळता-खेळता मुलांनी बीजसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश आत्मसात केला. वर्गखोल्यांबाहेर घडलेला हा उपक्रम मुलांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरला. सीड बॉल पावसाळ्यात डोंगराळ, दुर्गम आणि ओसाड भागात फेकल्यास योग्य वातावरण मिळाल्यावर त्यातून रोपे उगवतात आणि नैसर्गिकरीत्या हरितक्षेत्र वाढण्यास मदत होते. ही संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आली. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, याची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात रुजल्याचे प्राचार्य मनोज परमार म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी हातात सीड बॉल घेत “झाडे लावू, झाडे जगवू आणि पर्यावरण वाचवू” अशी सामूहिक प्रतिज्ञा केली. या निरागस हातांनी तयार केलेले बीजगोळे उद्या हजारो वृक्षांचे रूप धारण करतील, अशी आशा व्यक्त करत ‘अनुभूती ट्री फेस्टिव्हल’ ने पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.





