कुमुद साळुंखेची उल्लेखनीय कामगिरी, पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेत पटकावला चौथा क्रमांक

जळगाव, दि.३ (जनसंवाद live): महाराष्ट्र राज्य योग असोसिएशनतर्फे पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ४७ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याच्या संघात काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव येथील विद्यार्थिनी कुमुद सुनील साळुंखे हिची निवड झाली होती.
राज्यस्तरीय स्पर्धेत कुमुदने उत्कृष्ट योगकौशल्य, आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध सादरीकरणाच्या जोरावर चौथा क्रमांक पटकावत जळगाव जिल्हा, शाळा आणि आपल्या कुटुंबाचा गौरव वाढविला. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कुमुदचे वडील श्री. सुनील साळुंखे हे महाराष्ट्र पोलीस खात्यात कार्यरत असून, कर्तव्य बजावत असतानाही त्यांनी आपल्या मुलींना शिक्षणाबरोबरच क्रीडा व योग क्षेत्रात सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. तसेच कुमुदची आई श्रीमती प्रतीक्षा साळुंखे या गृहिणी असून, मुलींचा नियमित सराव, वेळेचे नियोजन, मानसिक बळ आणि सातत्यपूर्ण प्रेरणा देण्यात त्यांचेही मोलाचे योगदान राहिले आहे. पालकांच्या या पाठबळामुळेच कुमुदला हे यश मिळविणे शक्य झाले.
विशेष म्हणजे, कुमुदची मोठी बहीण हर्षिता साळुंखे हिनेही मागील वर्षी विभागीय वरून राज्यस्तरीय निवड योगासन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून कुटुंबाचा गौरव वाढविला होता. आता कुमुदनेही त्याच परंपरेला पुढे नेत राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकावत सलग दुसऱ्या वर्षी साळुंखे कुटुंबाच्या यशाचा मान उंचावला आहे.
कुमुद आणि हर्षिता या दोघींनाही योग प्रशिक्षक डॉ. अनिता पाटील यांच्या योगा क्लासेस यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रशिक्षण व प्रेरणा लाभली. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळे दोन्ही विद्यार्थिनींनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवत जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.
कुमुदच्या या यशाबद्दल डॉ. अनिता पाटील यांचे योगा क्लासेस स्टुडिओ योग प्रशिक्षक जळगाव जिल्हा योग असोसिएशन तसेच क्रीडा व योगप्रेमींनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वडील पोलीस कर्मचारी व आई गृहिणी आहे पालकांचे संस्कार, योग प्रशिक्षक डॉ. अनिता पाटील मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर साळुंखे भगिनींनी सलग दोन वर्षे राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करून जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला आहे. त्यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.”.





