रोटरी क्लब जळगाव अंतर्गत नंदिनीबाई विद्यालयात मुलींसाठी लाठी काठी प्रशिक्षण शिबिर संपन्न

जळगाव, दि. २३ (जनसंवाद live): रोटरी क्लब जळगांव अंतर्गत विद्यार्थिनींना लाठीकाठीचे पाच दिवसीय स्व – संरक्षण प्रशिक्षण देण्यात आले, शनिवार दि. २२ रोजी नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर माननीय अनिल कांकरिया, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, रोटरी क्लब जळगावच्या मानद सचिव स्वाती ढाके, प्रोजेक्ट चेअरमन डॉ माधुरी कासट, रो. रितेश जैन, रो. विश्वजीत बऱ्हाटे, रो. तेजस पवार, हर्षदा भंगाळे, आदिती कुलकर्णी, कु. मृण्मयी कुलकर्णी व प्रशिक्षण देणारे कु. चिन्मयी बाविस्कर व त्यांची टीम उपस्थित होती. तसेच विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती एस. एम. राणे, विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही. एस. सैंदाणे आणि पर्यवेक्षिका बी. एस. राणे यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ. अर्चना चौधरी यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणादरम्यान आत्मसात केलेल्या लाठी-काठीच्या विविध कौशल्यांचे सादरीकरण केले.
पाच दिवसांच्या या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना लाठी-काठीचे कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच शारीरिक क्षमता, धैर्य, एकाग्रता आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व समजले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळते.
लाठी-काठी प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर मा. अनिल कांकरिया यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी लाठी-काठी प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना स्वसंरक्षण, शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, शिस्त व प्रसंगावधान यांचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व उत्साह निर्माण झाला. रोटरी क्लब जळगांवचे मानद अध्यक्ष हेमंत भंगाळे यांनी संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करण्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.

रोटरी क्लब जळगावच्या मानद सचिव स्वाती ढाके यांनी मुलींनी शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करून सक्षम, निर्भय व आत्मविश्वासपूर्ण बनावे, असा संदेश दिला. लाठी-काठी प्रशिक्षणाचा नियमित सराव करून त्याचा उपयोग केवळ शारीरिक कौशल्यासाठी नव्हे, तर आत्मविश्वास आणि मानसिक ताकद वाढविण्यासाठीही करावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी एस जे. ओस्तवाल यांनी मान्यवरांचे आभार मानले.





